Friday, December 31, 2010

दुसरे दुर्गसाहित्य सम्मेलन


'गो.नी.दां' दुर्गप्रेमी मंडळ आयोजित दुसरे दुर्गसाहित्य सम्मेलन शनिवार दि. ५ व रविवार दि. ६ फेब्रुअरी २०११ रोजी निसर्गरम्य परिसरातील इतिहासकालीन राजमाची किल्ल्यावर संपन्न होत आहे. या सम्मेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत प्रा. डॉ. ब्रम्हानंद देशपांडे. सुप्रसिध्द कला दिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई या सम्मेलनाचे उदघाटक म्हणून उपस्थित राहाणार आहेत. स्वागताध्यक्ष आहेत केंद्र शासनाचे वैद्न्यानिक सल्लागार श्री. रवींद्र अभ्यंकर.
फेब्रुअरी २००९ मध्ये राजमाची येथे आयोजित केलेल्या पहिल्या दुर्गसाहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष माननीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, स्वागताध्यक्ष श्री. शेखर नानिवडेकर व पहिल्या दुर्गसाहित्य पुरस्काराचे मानकरी प्रा. प्र. के. घाणेकर हेही द्वितीय दुर्गसाहित्य सम्मेलनात उपस्थित राहाणार आहेत.
दि. ५, ६ फेब्रुअरी २०११ च्या द्वितीय दुर्गसाहित्य सम्मेलनात सु्प्रसिध्द दुर्गसाहित्यिक श्री. आनंद पाळंदे यांना दुसरा दुर्गसाहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
वर उल्लेख केलेल्या मान्यवरांव्यतिरिक्त इतर अनेक दुर्गप्रेमी व निसर्गप्रेमी साहित्यिक (पांडुरंगराव बलकवडे, आनंद देशपांडे, मोहन शेटे, कुलदीप देसाई, उष:प्रभा पागे, डॉ. विजय देव, डॉ. वीणा देव, अभिजित बेल्हेकर, डॉ. संदीप श्रोत्री, वगैरे) दि. ५, ६ फेब्रुअरी २०११ च्या सम्मेलनात उपस्थित राहाणार आहेत.
या दोन दिवसांच्या सम्मेलनात स्वागताध्यक्ष, उदघाटक व सम्मेलनाध्यक्ष यांची भाषणे, दुर्गांसंबंधी विषयांवर परिसंवाद, दुर्गविषयक प्रश्णमंजुषा, दुर्गमहात्म्य या विषयावर कीर्तन, काही पुस्तकांचे प्रकाशन . . . असा भरगच्च कार्यक्रम कार्यक्रम आखलेला आहे.
सुप्रसिध्द चित्रकार श्री. भास्कर सगर यांनी जलरंगात चितारलेल्या दुर्गचित्रांचे प्रदर्शन तसेच दुर्गविषयक पुस्तकांचे विक्रीकेंद्र या सम्मेलनाच्या बाजूला असेल.
सम्मेलनात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे. प्रवेशशुल्क प्रत्येकी रुपये पाचशे आहे. नाव नोंदणीसाठी अर्जाचे फॉर्म्स मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, महाड, वगैरे शहरातील काही दुर्गप्रेमींकडे उपलब्ध आहेत.
नाव नोंदणीसाठी अर्जाचा फॉर्म व सूचना इंटरनेटवरऊन घेता येईल मराठी भाषेतील फॉर्म व सूचना यांच्या PDF Files खालील लिंकवर मिळतील. त्या उतरवून घेऊन त्यांचे प्रिंट्स काढावे.

नाव नोंदणीसाठी अर्जाचा फॉर्म


नाव नोंदणीसंबंधी सूचना

नाव नोंदणीसाठी अर्जाचे छापील फॉर्म्स कोणाकडून घ्यावे, नाव नोंदणी संबंधी माहिती तसेच या दुर्गसाहित्य सम्मेलनासंबंधी अधिक माहिती . . . यासाठी मुकुंद गोंधळेकर ( फोन नं. 92235 79685 / 90117 68348 ) किंवा डॉ. विजय देव ( फोन नं. 94225 16532) यांचेशी संपर्क साधावा.
राजमाचीसारख्या दुर्गम ठिकाणी हे सम्मेलन आयोजित केले असल्यामुळे सम्मेलनात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवावी लागणार आहे. निराशा टाळण्यासाठी कृपया त्वरित नाव नोंदणी क्ररावी.

Wednesday, October 13, 2010

गो. नी. दाण्डेकरांच्या जैत रे जैत कादंबरीचे अभिवाचन

कादंबरीकार गो. नी. दाण्डेकरांच्या साहित्यातील एक महत्वाचं दालन म्हणजे महाराष्ट्रातल्या दुर्गांना पार्श्वभूमीवर ठेऊन त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या. ते स्वत: जातीवंत भटके. दुर्ग हा त्यांचा आत्यंतिक प्रेमाचा विषय. त्यांनी दुर्गांवर अनेकदा वास्तव्य केलं. तिथल्या रहिवाशांशी त्यांचं मैत्र झालं. त्यांच्या सुखद:खांना गोनीदांच्या कादंबऱ्यांत स्थान मिळालं. काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती कादंबरीतल्या व्यक्तिरेखा झाल्या. त्यातल्या काही आजही किल्यावर गेलं कि भेटतात. कादंबऱ्यांमधून आपण जवळपास सगळा दुर्ग अनुभवतो. तिथल्या राहाळात मनानं वावरतो. ’पवनाकाठचा धोंडी’, ’जैत रे जैत’, ’रानभुली’, ’वाघरु’, ’त्या तिथे रुखातळी’ आणि माचीवरला बुधा’ या त्या सहा कादंबऱ्या. तुंग, कर्नाळा, रायगड, राजगड, भिवगड (कल्पित किल्ला) आणि राजमाची अशा सहा दुर्गांची पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे.
जैत रे जैत’ ही कादंबरी आणि त्यावर आधारलेल्या चित्रपटातील कथानक कर्नाळा किल्याच्या परिसरात घडते. गोनीदांच्या शब्दाशब्दातून जिवंत होणारा हा अनुभव आपल्याला घेता येणार आहे थेट त्याच राहाळात, कर्नाळा किल्याच्या पायथ्याशी. श्री. सुनील राज (संपादक, जिद्द मासिक) यांनी तेथे आयोजित केले आहे जैत रे जैत कादंबरीचे आभिवाचन. गोनीदांचे आप्त वीणा देव, विजय देव आणि रुचिर कुलकर्णी जैत रे जैत कादंबरीचे आभिवाचन करणार आहेत तिथे.
जैत रे जैत च्या आभिवाचनाचा हा कार्यक्रम होणार आहे येत्या आश्विन पॊर्णिमेच्या टिपुर चांदण्यात, शनिवार दि. २३ ऑक्टोबर २०१० रोजी संध्याकाळी ०६.०० पासून. कर्नाळा अभयारण्याजवळ कल्हे गावाच्या हद्दीत, मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्व बाजूला, निसर्गरम्य परिसरात हा अभिनव कार्यक्रम अयोजित केला आहे. या कार्यक्रमानंतर, त्याच ठिकाणी रात्रीच्या भोजनाची व्यवस्था आणि पनवेलपर्यंत परतीसाठी वाहन व्यवस्था सशुल्क प्रवेशिका घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहाणाऱ्या रसिकांसाठी करण्यात येईल.
या कार्यक्रमाचे आयोजन, माय बिझिनेस क्लब, मारुती ऍडव्हेंचर ऍंड स्पोर्टस असोसिएशन व गोनीदा दुर्गप्रेमी मंडळ या संस्थांच्या सहकार्याने केले आहे.
या कार्यक्रमात प्रवेश सशुल्क आहे. कार्यक्रमासाठी प्रवेशिका लागू बंधु मोतीवाले यांच्या दादर, ठाणे व पुणे येथील दुकानांत उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी सॊ. परिणीता राज यांचेशी ९२२२१ ५०९७५ या भ्रमणध्वनीवर कृपया संपर्क साधावा.
गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाकरिता
मुकुंद गोंधळेकर
पनवेल
फोन ९२२३५ ७९६८५ / ९०११७ ६८३४८

Thursday, May 27, 2010

गोनीदांचा स्मृति दिन

गोपाल नीलकंठ दाण्डेकर (गोनीदा ऊर्फ अप्पा) एक निखळ दुर्गप्रेमी व जातीवंत भटके. त्यांनी अनेकांना दुर्गभ्रमंतीचे वेड लावले. गोनीदानी दुर्गविषयक लेखन विपुल केले. अप्पांच्या सांगाती केलेल्या दुर्गभ्रमंतीच्या स्मृती म्हणजे अनेक दुर्गप्रेमींच्या मर्मबंधातील ठेव.
१ जून १९९८ रोजी इहलोकीच्या सर्व दुर्गप्रेमीना मागे सोडून अप्पा स्वर्गगडावर गेले. कधीही त्या गडावरून खाली न उतरण्याचा संकल्प करून, कायमच्या वास्तव्यासाठी.
गोनीदांच्या स्मृतिदिनानिमित्त इतिहासप्रेमी मंडळ, पुणे यांनी खालील कार्यक्रम आयोजित केला आहे :-

ऍडव्होकेट आनंद देशपांडे यांचे भाषण :
विषय - गोनीदांची दुर्गाभ्रमंती

श्री. निनाद बेडेकर यांचा स्लाइडस शो :
विषय - दुर्ग बांधणीची विविध रुपे

कार्यक्रमाचे स्थळ - भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ, पुणे
वेळ - सायंकाळी ०६.०० वाजता, मंगळवार, दि. ०१ जून २०१०
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Wednesday, April 28, 2010


गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाचे एक शिबिर दि. २४, २५ एप्रिल २०१० रोजी (शनिवार, रविवार) आयोजित करण्यात आले होते. पुणे-सिंहगड मार्गावरील डोणजे गावाजवळ, निसर्गरम्य नंदनवन सोसायटीतील श्री. जयप्रकाश सुराणा यांच्या बंगल्यात शिबिर पार पडले. सौ. वीणा व विजय देव, निनाद बेडेकर, शेखर नानिवडेकर, डॉ. जयंत नवरंगे, आनंद देशपांडे, अभिजित बेल्हेकर, मोहन शेटे, रमेश आपटे, स्नेहा आपटे, कुलदीप देसाई, पांडुरंग बलकवडे, रवि यादव, मनोज भांगरे, धनंजय मदन, मंदार कर्वे, श्रध्दा तिसगावकर, मुकुंद गोंधळेकर, या षिबिरात सहभागी झाले होते.
गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाची औपचारिक स्थापना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाची घटना तयार करून सोसायटीज रजिस्ट्रेशन अधिनियमाखाली व आवश्यक असल्यास पब्लिक ट्रस्टस अधिनियमाखाली नोंदणी करावी असे ठरविण्यात आले. याबाबतचे काम आनंद देशपांडे, शेखर नानिवडेकर व रवि यादव हे करतील.
२०११ चे दुसरे दुर्गसाहित्य सम्मेलन राजमाची येथे जानेवारीमध्ये आयोजित करावे तसेच राजमाची येथे विद्यार्थी व युवा वर्गासाठी शिबिरे आयोजित करावी असेही ठरविण्यात आले.
शनिवार दि. २४ एप्रिल २०१० रोजी रात्री डॉ. जयंत नवरंगे (बालरॊग तज्ञ) याचे उदबोधक व्याख्यान झाले. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार, दिनचर्या, व्यायाम याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
निनाद बेडेकर यांनी अलिकडेच ६१ व्या वर्षात पदार्पण केले व त्यानिमित्ताने त्यांनी वर्षभरात ६० पेक्षा जास्त दुर्गांना भेटी दिल्या. याबद्दल रविवार दि. २ एप्रिल २०१० रोजी सकाळी सिंहगडावरील गाडी तळावर निनाद बेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी केलेल्या भाषणात निनादरावांनी कवि भूषणाची ओळख करून दिली व त्याच्या काव्यातील सौंदर्य स्थळे विषद केली. कवि भूषण व त्याचे काव्य यावर निनाद बेडेकर एक ग्रंथ लिहित आहेत. सदर ग्रंथ लवकरच प्रसिध्द होईल असे आश्वासन निनादरावांनी यावेळी दिले. गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या शिबिरात सहभागी झालेल्यांव्यतिरिक्त सिंहगडावर रविवारी सकाळी येणारे अनेकजण या सत्कार समारंभाला उपस्थित राहिले.

या कार्यक्रमांची क्षणचित्रे पाहाण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर कृपया क्लिक करा.
http://picasaweb.google.co.in/goneeda.durgapremi/dJVkbJ#



Tuesday, January 12, 2010


गो. नी. दाण्डेकरांच्या जैत रे जैत कादंबरीचे अभिवाचन

कादंबरीकार गो. नी. दाण्डेकरांच्या साहित्यातील एक महत्वाचं दालन म्हणजे महाराष्ट्रातल्या दुर्गांना पार्श्वभूमीवर ठेऊन त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या. ते स्वत: जतीवंत भटके. दुर्ग हा त्यांचा आत्यंतिक प्रेमाचा विषय. त्यांनी दुर्गांवर अनेकदा वास्तव्य केलं. तिथल्या रहिवाशांशी त्यांचं मैत्र झालं. त्यांच्या सुखद:खांना गोनीदांच्या कादंबऱ्यांत स्थान मिळालं. काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती कादंबरीतल्या व्यक्तिरेखा झाल्या. त्यातल्या काही आजही किल्यावर गेलं कि भेटतात. कादंबऱ्यांमधून आपण जवळपास सगळा दुर्ग अनुभवतो. तिथल्या राहाळात मनानं वावरतो. ’पवनाकाठचा धोंडी’, ’जैत रे जैत’, ’रानभुली’, ’वाघरु’, ’त्या तिथे रुखातळी’ आणि माचीवरला बुधा’ या त्या सहा कादंबऱ्या. तुंग, कर्नाळा, रायगड, राजगड, भिवगड (कल्पित किल्ला) आणि राजमाची अशा सहा दुर्गांची पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे.
जैत रे जैत’ ही कादंबरी आणि त्यावर आधारलेल्या चित्रपटातील कथानक कर्नाळा किल्याच्या परिसरात घडते. गोनीदांच्या शब्दाशब्दातून जिवंत होणारा हा अनुभव आपल्याला घेता येणार आहे थेट त्याच राहाळात, कर्नाळा किल्याच्या पायथ्याशी. गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाने तेथे आयोजित केले आहे जैत रे जैत कादंबरीचे आभिवाचन. गोनीदांचे आप्त वीणा देव, विजय देव आणि रुचिर कुलकर्णी जैत रे जैत कादंबरीचे आभिवाचन करणार आहेत तिथे. ज्या आदिवासी नृत्यांची, ढोल वादनाची अप्रतिम वर्णने दाण्डेकरांनी केली आहेत तशाच आदिवासी नृत्यांचा रोमांचक अनुभवही आपल्याला त्यावेळी घेता येईल.
जैत रे जैत च्या आभिवाचनाचा आणि आदिवासी नृत्यांचा हा कार्यक्रम होणार आहे येत्या माघी पॊर्णिमेच्या टिपुर चांदण्यात, शनिवार दि. ३० जानेवारी २०१० रोजी संध्याकाळी ०६.३० पासून. कर्नाळा अभयारण्याजवळ कल्हे गावाच्या हद्दीत, मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्व बाजूला, निसर्गरम्य परिसरात हा अभिनव कार्यक्रम अयोजित केला आहे.
या कार्यक्रमानंतर, त्याच ठिकाणी रात्रीच्या भोजनाची व्यवस्था आणि पनवेलपर्यंत परतीसाठी वाहन व्यवस्था कार्यक्रमाला उपस्थित राहाणाऱ्या रसिकांसाठी करण्यात येईल.
या कार्यक्रमाचे आयोजन दुर्गमित्र, मारुती ऍडव्हेंचर ऍंड स्पोर्टस असोसिएशन, यंग झिंगारो ट्रेकर्स व जिद्द या संस्थांच्या सहकार्याने केले आहे.
या कार्यक्रमात प्रवेश सशुल्क आहे. कार्यक्रमासाठी प्रवेशिका खालील ठिकाणी मिळतील -
१. लागू बंधु मोतीवाले ( दादर, ठाणे व पुणे येथील दुकाने)
२. आयडियल बुक डेपो, दादर.
अधिक माहितीसाठी ९२२२१५०९७५ या भ्रमणध्वनीवर कृपया संपर्क साधावा.
मुकुंद गोंधळेकर
गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाकरिता

Friday, January 8, 2010

गोनीदांच्या दुर्गविषयक कादंबऱ्यांचा आस्वाद घेणारा परिसंवाद

गो. नी. दाण्डेकरांच्या साहित्यातलं एक महत्वाचं दालन म्हणजे महाराष्ट्रातल्या दुर्गांना पार्श्वभूमीवर ठेऊन त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या. ते स्वत: जातीवंत भटके. दुर्ग हा त्यांचा आत्यंतिक प्रेमाचा विषय. त्यांनी दुर्गांवर अनेकदा वास्तव्य केलं. तिथल्या रहिवाशांशी त्यांचं मैत्र झालं. त्यांच्या सुखदु:खांना गोनीदांच्या कादंबऱ्यांत स्थान मिळालं. काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती कादंबरीतल्या व्यक्तिरेखा झाल्या. त्यातल्या काही आजही किल्यावर गेलं कि भेटतात. कादंबऱ्यांमधून आपण जवळपास सगळा दुर्ग अनुभवतो. तिथल्या राहाळात मनानं वावरतो. ’पवनाकाठचा धोंडी’, ’जैत रे जैत’, ’रानभुली’, ’वाघरु’, ’त्या तिथे रुखातळी’, आणि ’माचीवरला बुधा, या त्या सहा कादंबऱ्या. तुंग, कर्नाळा, रायगड, राजगड, भिवगड (कल्पित किल्ला) आणि राजमाची अशा सहा दुर्गांची पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे.
गोनीदांच्या या सहा दुर्गविषयक कादंबऱ्यांचा आस्वाद घेणारा परिसंवाद ’गोनीदा’ दुर्गप्रेमी मंडळाने आयोजित केला आहे. मंबईत दादर (पश्चिम) येथील वनमाळी सभागृहात मंगळवार दि. १९ जानेवारी २०१० रोजी संध्याकाळी ०६.३० होणाऱ्या या परिसंवादात श्री. निनाद बेडेकर, डॉ. वीणा देव, ऍडव्होकेट आनंद देशपांडे व श्री. अभिजीत बेल्हेकर सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात प्रवेश सर्वांना खुला आहे. सभागृहात आसनव्यवस्था मर्यादित असल्यामुळे या परिसंवादाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या श्रोत्यांनी आपले नाव एस.एम.एस. द्वारे ९२२२१ ५०९७५ या भ्रमणध्वनीवर नोंदवावे. या कार्यक्रमासंबंधी अधिक माहिती याच भ्रमणध्वनीवर मिळेल.
या परिसंवादाचे आयोजन ’दुर्गमित्र’, ’मारुती ऍडव्हेंचर ऍंड स्पोर्टस असोसिएशन’, यंग झिंगारो ट्रेकर्स, व ’जिद्द’ या संस्थांच्या सहकार्याने केले आहे.
मुकुंद गोंधळेकर
’गोनीदा’ दुर्गप्रेमी मंडळाकरिता